marathi blog vishva

गुरुवार, १ डिसेंबर, २०११




---------------------------------------------------------------------------
नारदाची कळ---१९
एफ डी आय----फाईन्ड डॉलर्स इन इन्डिया
    राजकारण कोणी जनसेवेसाठी करीत नसते. राजकारण असते पैसे कमावण्यासाठी. म्हणूनच तर एक निवडणूक लढवायची तर आजकाल दहा बारा कोटी तरी लागतातच. राजकारणी जेव्हा लाचलुचपतीत पकडल्या जातात तेव्हा कमीत कमी दहा बारा हजार कोटी रुपयांची तरी अफरातफर असावी लागते. आजकालचे ते प्रमाणच झाले आहे. २-जी घोटाळा एक लाख कोटींचा. फुटकळ आजकाल कोणी खातच नाही.
    असे असताना फुटकळ व्यापारात सरकार दरबारचे एवढे का म्हणून लक्ष गेले असावे ? वॉलमार्ट ५१ टक्के गुंतवणूक घेऊन येईल, तेव्हा ४९ टक्के गुंतवणूक तर इथल्यांचीच लागेल ना ? त्यांच्याशी जे हातमिळवणी करतील त्यांना मग नफाच नफा मिळणारा आहे. आता त्यांच्याशी जे कोलॅबोरेशन करणार ते कोण असणार आहेत. ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा मुबलक आहे अशाच कंपन्या आणि मोठे लोक. राजकारण्यांकडे जर काही हजार कोटी असतील तर ते कुठे गुंतवतील ? वॉलमार्ट चांगला धंदा आहे की ! त्यात आरामात गुंतवता येतील. नुसते वॉलमार्ट येणार म्हटले की इथल्या रिटेल कंपन्यांचे शेअर्स लगेच एका दिवसात १७ टक्क्यांनी वाढले त्यावरून वारे कोणत्या दिशेने वाहते आहे ते कोणालाही कळावे.
    २-जी घोटाळ्यात बलवाने कनीमोळीच्या कंपनीला २०० कोटी रुपये बिनतारणाचे कर्ज दिले होते. आता हे पैसे त्यांनी परत केले असे दाखवले तरी २०० कोटी रुपये कोणाकडे तरी ज्यादा झालेले फिरत आहेत हे तर नक्कीच. सोनिया गांधींचा जावई, वढेरा, ह्यांना दिल्लीची एक बांधकाम व्यवसायातली कंपनी, डीएलएफ, २५ कोटी रुपये बिनतारणाचे कर्जाऊ देते, हे पाहिल्यावर त्यांच्याकडे निश्चितच असे अजून कित्येक हजार कोटी रुपये जमा झालेले असतील. ते कुठे बरे गुंतवणार ? त्यांना वॉलमार्ट चांगलेच की ! कदाचित डॉलरमध्येही  त्याचा लाभ घेता येईल.
    एवढे हे प्रकरण महत्वाचे असताना, लोकसभा चालली काय अन्‌ न चालली काय ? आठ दहा दिवसात काही तरी मार्ग निघेल किंवा फार फार न्युक्लियर बिलासारखा काही मतांचा खर्च करावा लागेल. पण गुंतवणुकीची इतकी चांगली संधी राजकारणी कशाला सोडतील ? काही काळजी करू नका, सर्वांची नीट व्यवस्था लागेल !

--------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
-------------------------------------------------------------------

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०११

सामूहिक लोकपाल उत्सव !
---------------------------------------------
लोकमान्य अण्णा हजारेंनी सामूहिक लोकपाल उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या सिव्हिल सोसायटीचा जन-लोकपाल पाहून भारताच्या लोकसभेनेही लोकपाल बसवण्याचे ठरवले. आता विरोधी पक्षाला अगदी ५२ फुटी उंचीचा लोकपाल हवा होता, तेव्हा त्यांनी उंची तोलून धरणारा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचाच लोकपाल बसवायचे ठरवले. विरोधी पक्षाचा ह्यात डाव असा होता की प्लॅस्टर ऑफ पॅरीस मुळे हव्या त्या साचात लोकपालाला घडवता येईल. कॉंग्रेसला मात्र पर्यावरण-मैत्रीचा, मातीचा, लोकपाल हवा होता. त्यांच्या मते तो इथल्या मातीचाच असल्याने लवकर विरघळेल. शिवाय सर्वांचेच पाय मातीचेच असल्याने, लोकपालही मातीचाच असलेला बरा. एक हूल म्हणून राहूल म्हणाला खरा की लोकपालाचे आपण एक कायमचे स्वतंत्र पीठच स्थापू. पण ते नंतरचे ! ( विरोधी पक्षाला एरव्ही सोनियांचे परकीयपण खुपते पण लोकपाल मात्र त्यांना पॅरीसच्या मातीचा का हवा ? ). अण्णांचा लोकपाल उजव्या सोंडेचा असेल तर इतरांचा डाव्या सोंडेचा ! श्रीमती अरुणा रॉय ह्यांना मात्र सगळ्यांचा मिळून केलेला लोकपाल, झाला तर, पाहिजे होता. आता सगळ्यांचा मिळून लोकपाल कसा असेल ? ---पोट विशाल व सैलसे असावे म्हणून लवचिकतेचे, रबराचे असावे, हात लंबे असावेत ( कनून के हात लंबे होते है ना ? ), ह्रदय कणखर लोखंडाचे असावे व पाय मातीचे असावेत, असे सामूहिकपणे लोकपालाचे रूप ठरले.
लोकपालाला जनजागृतीच्या क्रांतीच्या, लाल रंगाचे, फार महत्व असल्याने गणपतीप्रमाणेच ह्याला लाल रंगाची फुले वहावीत असे ठरले. गणपतीला जशा दुर्वा प्रिय असतात तशा लोकपालाला कॉंग्रेस गवताच्या दुर्वा चढवाव्यात असा प्रस्ताव ठेवण्यात आला. लोकपालाचे वाहन म्हणून ( गणपतीचा जसा उंदीर ) टोपी परिधान केलेले अण्णा नियुक्त करण्यात आले. रूढी अशी की लोकपाला जवळ जाण्याआधी लोकांनी बाहेर बसवलेल्या अण्णांच्या कानात हळूच आरोप पुटपुटावेत. जसे गणपतीच्या दर्शनार्थ आलेले भक्त आपली करुणा उंदीराच्या कानात सांगतात व ती गणपतीला पोचते तशीच ही व्यवस्था असेल. उदाहरणार्थ; तक्रारपती अण्णांच्या कानात पुटपुटू शकतील.." अण्णा, शरदजींचे लवासामध्ये इतके झाले आहेत आता !..". किंवा "अण्णाजी, सोनियाजींचा बदललेला स्विस नंबर आहे एकदोनतीनचार...".
प्रत्येक जण लोकपाल आपापल्या सोयीनुसार बसवू शकतील. बहुदा कॉंग्रेस-वाले दीड दिवसाचा ठेवतील, तर भाजप-वाले पूर्ण बारा दिवसांचा. लोकपालांच्या आरती नंतर खिरापत आपापसात वाटून घेण्याची गणपतीची प्रथा इथेही चालू ठेवावी लागेल. राज्याराज्यात छोटे लोकपाल म्हणजे लोकायुक्त बसवावेत. हे छोटे लोकपाल पालीकेच्या हौदात विसर्जित होतील, तर मोठे जन-लोकपाल भव्य अशा सागरात ( जन-सागरात ) विसर्जित होतील. लोकपालाबरोबर गौरी बसवायच्या असतील तर किरण बेदी-मेधा पाटकर, मायावती-ममता, वा अरुणा रॉय-सोनीया अशा ज्येष्ठा-कनिष्ठा जोड्या बसवता येतील. रोज लोकपालाची खाली दिलेली आरती करण्यात येईल व टेबलाखालून सर्वांना खिरापत वाटण्यात येईल.
कुठल्याही सामूहिक दैवताच्या आख्यायिका असाव्या लागतात तरच ती दैवते चांगली फोफावतात असे आढळून आल्याने, सामूहिक लोकपालाच्या खालील आख्यायिका अधिकृत समजल्या जातील :
१) एकदा सर्व लोकपाल शर्यत लावतात. प्रत्येक लोकपालाकडे एक सरकारचा घडा दिलेला असतो. त्यात त्याने एक भ्रष्टाचाराचा अपराध झाला की एक खडा टाकायचा. ज्याचा घडा लवकर भरेल व जो जगाला तीन प्रदक्षिणाही घालील तो लोकपाल विजयी घोषित करण्यात येईल. अण्णांचा जनलोकपाल खूप हुशार असतो. तो गुपचूप महाराष्ट्रात येतो, रस्त्यावरची उखडलेली खडी घडयात टाकतो व राळेगणसिद्धीला तीन प्रदक्षिणा घालतो. त्यालाच विजयी घोषित करतात. कारण राळेगणसिद्धी हेच त्याचे जग असते !
२) एकदा न्हाणीघरात सोनियाजी न्हात असतात. ( हिंदी व्हर्शन: एक बार सोनियाजी भारतकी गंगा न्हा रहे थे ! ). बाहेर रखवालीला त्या आपल्या विश्वासातल्या मनमोहनाला बसवतात. ( राहूल अजून तयार झालेला नसतो ). तेव्हढ्यात तिकडून एक "जनता" येतो. ( अरे, ये जनताही खरी मालिक है, ये तो उसके सेवक है !--- इति रामलीलावरचे अण्णा .). तो म्हणतो मला बाईंना भेटायचेय. मनमोहन मना करतो. "जनता"ला राग येतो. तो मनमोहनाशी लढतो. त्यात मनमोहनाचे डोके उडते. तेव्हढ्यात बाई बाहेर येतात व "जनता"ला म्हणतात, अरे हा तर आपलाच मनमोहन होता ना ! आता तर हा डोक्यानेच गेला. ह्याची पगडी आता कशी बांधायची ? सिर सलामत रहता तो पगडी पचास ना ! मग "जनता" म्हणते काही काळजी नको, आपल्या कडे भरपूर पांढरे हत्ती पाळलेले आहेत. त्यांच्याच एकाचे सिर लावू यात. तर तसे केल्यावर मनमोहनाचा लोकपाल तयार होतो व तोच सध्या आपल्यावर देखरेख करीत आहे बरे !
गणपतीला जसे मोदक प्रिय असतात, तसे लोकपालाला मिडीया-बाईटस्‌ प्रिय असून त्यांचे किमान २१ चॅनेल्स वरचे बाईटस्‌ लोकांना वाटावे लागतील. सामूहिक गणपतीच्या जशा आरोळ्या असतात तशा लोकपालांच्याही गर्जना असतील :
एक दोन तीन चार , सगळीकडे भ्रष्टाचार !;
किंवा एक दोन तीन चार, लोकपालांचे भय भय फार ! ;,
किंवा लोकपाल गेले कमीटीला ( स्टॅंडिंग कमीटीला ), चैन पडेना आम्हाला ! ;,
लोकपाल म्होरं या, पुढच्या वर्षी लौकर या ! ;,
किंवा लोकपाल गप्पा--थोर या ! ;,
किंवा लोकपाल गप्पा--बोर या ! ;,
लोकपाल गप्पा--घोर या ! ;.
सामूहिक लोकपाल उत्सवात ( अण्णा जसे "भारत माता की जय" असे आवाहन करतात तसेच, पण इस्लामप्रमाणे देशाला वा आईला देवाचा दर्जा नामंजूर असल्याने ) निधर्मी घोषणा असेल :
"भारत खाता ही-- हय !" किंवा "भारत जिताही--- नय !" किंवा "भारत खाता भी-- लय !" किंवा "भारत की नीती भी-- गय !"

-----------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
---------------------------------------------------------------------------------------
लोकपालाची आरती:
नोकरशहांना, खासदारांनो, वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी ऐट लोकपालाची
सर्वांगी सुदूर अटी भ्रष्टाचाराची
कंठी आवळे फास कारवाईची
जयदेव जयदेव जय लोकपाला, दर्शन मात्रे जन धन्य हो झाला

जय देव जय देव जय लोकपाला
तुमच्याच्याने देश स्वच्छ हो झाला
जय देव जय देव ... ||
तुमच्या फटक्याने घाबरले सारे
सांगती एकमेका सावध व्हा सारे
काळ्या पैशाने हो पोबारा केला
जय देव जय देव... ||
लोकपाल वंदूया लोकपाल भजूया
विसर्जनाची वाट पाहूया
संपले दहा दिवस खाऊया चला
जय देव जय देव ... ||

शनिवार, १६ जुलै, २०११

------------------------------------------------------------------------------------

नारदाची कळ----१८
राहूल गांधी : "सरकार सगळे आतंकवादी हल्ले रोखू शकत नाही, ९९ टक्के रोखू शकते पण १ टक्का हल्ला होऊ शकतो !"
श्रीमती सोनिया गांधी ह्या राहूल गांधीच्या जन्मावेळीच्या बाळंतपणात जरा अवघडल्या होत्या. एका व्हायरसने त्या खूपच आजारी पडल्या होत्या. त्या दरम्यान आलेल्या तापामुळे बाळ राहूलला इजा होणार होती. ताप जर लवकर कमी झाला नाही तर बाळावर परिणाम होऊन ते मेंटली रिटार्डेड निघण्याची शक्यता होती. डॉक्टरांनी सगळ्या देशोदेशीच्या तज्ज्ञांना बोलावले होते. एका इटालियन डॉक्टरकडे एक औषध होते खरे, पण अजून त्याच्या सर्व तपासण्या झालेल्या नव्हत्या. औषधाला अजून मंजूरी मिळालेली नव्हती . पण दुसरा काहीच इलाज नव्हता . बरीच खलबते झाली. शेवटी श्रीमती सोनिया गांधींना पूर्ण कल्पना देऊन ते औषध द्यावे असे ठरले. त्यांनी विचारले ह्यात धोका काय आहे ? डॉक्टर सांगू लागले ९९ टक्के केसेस मध्ये मेंटल रिटार्डेशन रोखण्यात यश येऊ शकेल, फक्त एक टक्का केस मध्ये....सोनिया गांधींना इतके दुखत होते की त्या म्हणाल्या...हरकत नाही...द्या एकदाचे लवकर...आणि यथावकाश त्या बाळंत झाल्या . बाकी सर्व ठीक होते पण बाळाची बुद्धीची वाढ होत नव्हती. त्यावर सोनिया ( व राजीव व इंदिरा ) म्हणाल्या काही हरकत नाही....ह्या १ टक्केवाल्याला मी भारतात वाढवीन व पायलट नाही तर नाही, पंतप्रधान तरी करीनच !
हा किस्सा ऐकल्यावर लगेच मनमोहनसिंगांची इतिहासकार मुलगी शोध घेऊ लागली की मनमोहनसिंग ह्यांचा जन्म कुठे झाला होता, डॉक्टर कोण होते, व ते औषध दिले होते का ?

---------------------------------------------------------------------------

शुक्रवार, ३ जून, २०११

नारदाची कळ---१६
स्वर्ग का नरक ?

आजकाल एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. स्वर्ग व नरक हे खरेच आहेत की नाहीत ? ह्यावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे शास्त्रीय निर्वाळा देतात की असे काही नसते. ह्याच विषयावर श्री.गिरिश कुबेर ह्यांनी लोकसत्तेत आजच एक लेख लिहिलेला आहे. त्यांचा "अन्यथा"सदरातला स्टीफन हॉकिंगवरचा लेख छानच आहे. पण मुळात कोणताच विचार काळे-गोरे ह्या काटेकोर रंग-परीघात बसणारा असत नाही . म्हणूनच तर गल्लतीची शक्यता कायम राहते .
ज्या स्टीफन हॉकिंगचे आपण गोडवे गातो त्याच्या, फार लोकांना माहीत नसलेल्या काही बाबी, त्याच्या बुद्धिमत्तेच्या प्रगल्भतेनंतर, जरा काळजीने पहा. ह्याची बायको इंग्रजीची प्राध्यापिका. तीन मुले व स्टीफन ह्यांचे आदर्श संगोपन करीत असताना, ह्या स्टीफन महाशयांनी ज्या विद्यार्थ्याने ह्यांच्या खुर्चीवर बोलण्याचा संगणक बसवून दिला होता, त्याच्याच बायकोबरोबर ( ही नर्स होती ) संधान जुळवले. एव्हढा गलितगात्र असतानाही, पहिलीशी घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्नही केले. तरीही त्यांचे चाळे शमले नाही. एकदा हा घरात मार लागून पडलेला आढळला, एका विद्यार्थ्याने पोलिसात नेले तर बायकोने ठिकठिकाणी ओरखडे काढलेले. ज्या विकलांग शरीरात इतकी प्रगल्भ बुद्धी वसते आहे, त्याच, एकही स्नायू काम न करणार्‍या शरीराने, त्याला इतके पछाडावे ? ह्या एकाच प्रमादापायी कोणाही चित्रगुप्ताने स्वर्गाची दारे ह्याला बंद करावीत असेच हे वागणे आहे. शास्त्रज्ञाच्या शिक्कामोर्तबाने आता ह्याने म्हणावे की स्वर्ग किंवा नरक असे काही नसते, तर ते शास्त्रीय किती व मानस-शास्त्रीय किती हे कळणे अवघड आहे.
आपला असा समज दिसतो की माणसाच्या ज्या नैसर्गिक उर्मी असतात त्या रास्तच असतात. पण जरा विचार केलात तर दिसेल की ह्या उर्मींना माणसाला कायम एका शिस्तीच्या स्वाध्यायाने पारखून घ्यावे लागलेले आहे. नर-मांस-भक्षणाचे उदाहरण घ्या. प्रथम आदिमानव नरमांसभक्षण करीत असे. त्या उर्मीला कठोर नीती-नियम लावून जेव्हा त्याने हजारो वर्षे स्वत:लाच पटवले, तेव्हाच ही उर्मी आताशी लोप पावत आली आहे. ही कठोर स्वाध्यायाची शिस्त बाळगणे ही स्वर्गाची एक प्रकारची हमीच म्हणायला हवी. मातागमन, बहिणीशी संग ह्या उर्मी ( जर कुणाला आल्याच तर ) शिस्तीने निकामी करण्यासाठीच कुठलाही समाज, आई-बहिणीवरच्या शिव्या निर्माण करत असतो. व तरीही तुम्ही त्या उर्मींबरोबर वाहवलात तर ते नर्कात पडल्यासारखेच आहे असे आपण समजतो. स्वर्ग वा नरक ह्या कल्पना ह्या शिस्तीसाठी आवश्यकच असतात, कुठल्याही धर्मात . तुमच्याच कार्यक्षेत्रातले उदाहरण घ्यायचे तर आजही अशी वर्तमानपत्रे आहेत ज्यात अग्रलेख चार ठिकाणी चार तुकड्यात दिलेला असतो. तुमच्यासारख्यांची शिस्तच मग व्यवस्थित अग्रलेखाला त्या वर्तमानपत्राला नरकातून काढते . स्वर्ग करते.
साहित्यात कविता हा प्रकार सहज स्फूर्तीचा आपण मानतो, व म्हणूनच न जाणो ह्या सहज-स्फूर्तीमुळे ह्या साहित्यप्रकारात काही गहिरे सत्य, मूल्य, असावे असे समजून त्याला चांगलाच मान देतो. पण कुठल्याही कवीला, भाषेच्या शिस्तीतून ( शब्द, अर्थ, वृत्त वगैरे ) ह्या स्फूर्तीला न्यावेच लागते. असे नेताना जर त्याने कधी "झपूर्झा" असा कधी न ऐकलेला शब्द वापरला असेल तर मग टीप द्यावी लागते की हा शब्द म्हणताना पोरी झिम्मा खेळताना जो आवाज होतो ( झिम पोरी झिम सारखा ) तसाच आवाज होतो. मानवी स्फूर्तींना शिस्तीचा, विवेकाचा, तारतम्याचा चाप प्रत्येक प्रबुद्ध समाजाला लावावाच लागतो व तेव्हाच तो स्वर्ग होतो. मग भले असा स्वर्ग स्टीफन हॉकिंग म्हणतात तसा अस्तित्वात असो वा नसो.
आपल्याकडे काश्मीरच्या सौंदर्याची वाखाणणी करताना म्हणतात की पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ( अमीनोस्तु अमीनोस्तु अमीनोस्तु ). ह्याच काश्मीरात परवा दल लेकवरचा एक काश्मीरी सांगत होता की, खरे तर आमच्या श्रीनगर चे आधीचे नाव श्री-नरक असले पाहिजे ! माणसांचा जसा कायम नरकाचा स्वर्ग करण्याचा चंग असतो तसा कधी कधी ( किंवा आजकाल बहुतेक ठिकाणी ) स्वर्गाचा नरकही होत असतो. मग स्नायू हतबल स्टीफनजी, स्वर्ग-नरक, नाहीतच असे कसे म्हणावे ?

----------------------------------------------------------------------------

रविवार, २४ एप्रिल, २०११

नारदाची कळ----१५
भ्रष्टाचारावरचा नवा तोडगा: जन-लोकपाल-फंड
आत्ताशी शहाणे लोक जन-लोकपाल-बिलाचा मसूदा वाचायला लागलेत. आता बर्‍याच जणांना जाणवायला लागलेय की हे प्रकरण दिसतेय तेवढे सरळ नाहीय. कोणी सांगावे ह्या मागे कोण असेल व त्याचा लाभ कोणाला मिळेल. तर शेवटी काय, हे राजकारणी अण्णांच्या जन-लोकपाल-बिलाला बधतील असे वाटत नाही.
आता ह्यावरचा अक्सीर रामबाण उपाय माझ्याकडे आहे तो जरा ऐका: "जन-लोकपाल-फंड":
१) एक फंड तयार करायचा, "जन-लोकपाल-फंड". ह्याचे सदस्य असतील त्या त्या मतदारसंघातले सर्व नोंदणीकृत मतदार. त्यांचे बॅंकेत खाते असणार, त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र असणार, युआयडी ओळखपत्र असणार.
२) लोकपाल बिलातून ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी ह्या फंडात खालील प्रमाणे रोख रक्कम भरायची आहे. ही रक्कम भरल्यानंतर त्यांना जन-लोकपाल-संघटना एक एक्झेंप्शन सर्टीफिकेट देईल, ज्यानुसार त्यांना जन-लोकपालांच्या भावी कारवाईतून मुक्ती मिळेल ( फक्त एक वर्षासाठी ):
नगरसेवक : रुपये : १ लाख
जिल्हा परिषद सभासद : रुपये : २ लाख
विधानसभा सदस्य : रुपये : ५ लाख
राज्याचा मंत्री : रुपये : १ कोटी
राज्याचा मुख्यमंत्री : रुपये : १० कोटी
लोकसभा सदस्य : रुपये : १० कोटी
केंद्राचा मंत्री : रुपये : १५ कोटी
केंद्रातले पंतप्रधान : रुपये : २५ कोटी
३) हा जन-लोकपाल-फंड दिल्लीत एकेठिकाणी असेल. भारतातल्या सर्व ठिकाणच्या शाखात त्यात पैसे जमा करण्याची मुभा असेल. त्यात जमा झालेली रक्कम समप्रमाणात प्रत्येक मतदाराच्या वैयक्तिक खात्यावर वर्षाच्या शेवटी हस्तांतरित करण्यात येईल. जन-लोकपाल-फंडाचे ऑडिटर ( किंवा लोकसभेचे सीएजी ) किती पैसे वाटायचे ते नक्की करतील.
४) एक्झेंप्शन सर्टिफिकेटचा भाव/दर दरवर्षी, कसा निधी जमा होतो, त्यावरून ठरवण्यात येईल. समजा खूप लोक पटापट पैसे भरताहेत असे दिसले ( उदा: २८ पैकी १४ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजा पैसे भरले, तर पुढील वर्षी त्यांचा भाव/दर प्रत्येकी १० कोटीहून वाढवून प्रत्येकी रुपये १२ कोटी करण्यात येईल. असेच वाजवी दर इतर राजकारण्यांसाठी ठरवण्यात येतील. हे पैसे राजकारण्यांनी निवडून आल्यावरच भरायचे असल्यामुळे व ज्यांना जरूर असेल त्यांनीच हे भरायचे असल्यामुळे ह्याने भ्रष्टाचार वाढणार नाही. ज्यांना आपण भ्रष्टाचार करणार नाही आहोत, अशी खात्री आहे त्यांना हे खर्च करावे लागणार नाहीत. तसेच समजा एखाद्याने एखाद्या वर्षी पैसे भरले पण कोणीच त्याच्याविरुद्ध काही तक्रार केली नाही तर दुसर्‍या वर्षी त्याने पैसे नाही भरले तर चालण्यासारखे आहे. तक्रार झाल्यावरही कोणाला मुक्ती हवी असेल तर तत्काल टिकीट जसे दुप्पटीचे असते तसा त्यांना दुप्पट दंड भरावा लागेल.
५) ट्रॅफिक पोलिसांनी वसूल केलेली दंडाची रक्कम वाटून घेतली तर जसा सामुदायिक जलसा होतो त्यावरूनच ही कल्पना सुचलेली आहे. ह्यात समजा राजकारण्यांनी दंड भरायचे कमी झाले तर चांगलेच आहे. कारण त्यावरून भ्रष्टाचार कमी होतोय असेच ठरेल. शिवाय आज राजकारणी जे मोकळे सुटतात त्याऐवजी चोराची पूर्ण रक्कम नाही तर काही तरी हाताला लागेल व ते सर्वांना वाटून दिल्याने सत्कारणी तरी लागेल. नाही तरी आजकाल सबसिडी अशीच बॅकेच्या खात्यातून द्यावी अशी सूचना पुढे येतेच आहे.
६) कोणी असा समज करून घेऊ नये की जन-लोकपाल-फंड हे बेकायदा कृत्य होईल. कारण अमेरिकेत व युरोपात प्ली-बारगेनींगच्या पद्धतीमुळे त्यांच्याकडे न्यायदानाचे काम खूपच लवकर व कमी खर्चाचे होते आहे. हा फंड हा एकप्रकारचा प्ली-बारगेनींगचाच एक प्रकार आहे, जो प्रगत देशात अगदी कायदेशीर समजल्या जातोय.

---------------------------------------------------------------------------------------------

रविवार, १७ एप्रिल, २०११

अण्णांचा दुभाष्या
आम्ही मागच्या वेळेसच दाखविले होते की जंतर-मंतरच्या उपोषणाच्या गादीवर बसलेले असताना, लोक सारखे अण्णांच्या कानात येऊन कुजबुजत होते. तर हे चांगले दिसत नाही म्हणून अण्णांनी आता प्रमुख मागणी केलेली आहे की त्यांना सरकारने एक दुभाष्या द्यावा. त्याप्रमाणे हा दुभाष्या आला व त्याच्या पहिल्याच मीटींगचा हा अनुवाद अण्णा वाचू लागले :
१) ह्यापुढे होणार्‍या सर्व जलद-मृत्यू कार्यक्रमासाठी सरकार जंतर-मंतर येथे रोज न्याहरी पुरवील, शक्य तितक्या लवकर.
( In future, for all the fast-unto-deaths to be undertaken at Jantar-Mantar the Govt. will endeavour to break fast , as soon as possible.)
२) ह्यापुढे जे कोणी जलद-मृत्यू चा कार्यक्रम हाती घेतील त्यांचे प्रत्येकी पाच सदस्य सरकार आपल्यात सामाऊन घेईल.
( Hereafterwards those who undertake fast unto death, the Govt., will co-opt their five members. )
३) जर जलद-मृत्यूच्या एखाद्या सदस्याविरुद्ध भानगडीच्या काही कडा प्रसिद्ध झाल्या आणि त्या कडाही भ्रष्ट आहेत असे जाहीर झाले,तर त्या सदस्याला राजीनाम्यापासून मुक्ती मिळेल.
( If any CDs are published about any member of the fast-unto-death, and if these are found to be corrupt then that member will be exempt from resignation. ).
४) जरी सभ्य-समाजाच्या सभासदांनी आपापल्या संपत्ती जाहीर केलेल्या असल्या तरी अ-सभ्य-सभासद तसेच करण्यास बांधील असणार नाहीत.
( Notwithstanding the self-disclosure of property by the members of the civil society, the others would not be bound by the same.)
५) ह्या पुढचे सर्व सभ्य-समाजाचे सभासद असे असतील की ते मायला, भूषणच असतील.
( All the future members of the civil society will be such that they will adorn the mother country.).
६) सर्व सभ्य-समाजाच्या सभासदांच्या सूचनांना प्रत्येकी एकेक टोपी घातली जाईल.
( The suggestions given by the civil society will be capped at one suggestion each ).
७) ह्यापुढले कोणतेही जलद-मृत्यूचे कार्यक्रम, हे काळे-टपाल न समजता सरकार ते स्वीकारील .
( The fasts-unto-deaths undertaken hereafterwards, would not be considered as black-mail and govt., would accept these. ).
८) पहिल्याच मीटींग मध्ये असे ठरले की सर्व पंतप्रधान, मंत्री, खासदार , सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी व इतर अर्जदार हे लोकपालांच्या अधिकार कक्षात येणार नाहीत. ( जसे अर्ज येतील, तसे त्यांच्याविरुद्ध स्ट्राईक करण्यात येतील.).
( After due discussion, it was decided that PM, Ministers, MPs, and secretary level beurocrats would fall / not fall under the jurisdiction of the lokpal-bill, as applicable. ). ( Strike out whatever is not applicable ).
९) ह्यापुढची मीटींग, योग्य अभ्यासक्रमात , मे मध्ये घेण्यात येईल.
( The next meeting, may be held in due course. ).
१०) खासदारांना जसे लोकसभेत दुभाषी-कान-फोन असतात तसे वा मानवी दुभाष्ये अण्णाना हजारोंनी पुरविण्यात येतील.
( As the mechanical interpreting head-phones are provided to MPs , the same and/or human translators would be provided to Anna Haazare ).
विशेष सूचना: सर्व सरकारी निर्णय मुळात इंग्रजीत घेण्यात आले आहेत, ते फकत सोयीसाठी त्यांच्या मायला, जिभेने दिलेले आहेत.
(NB: Official resolutions are made in English and are translated for the convenience of the mother tongue speakers )

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

नारदाची कळ---१३
अण्णांचे फिक्सिंग
२-जी, कॉमनवेल्थ, आदर्श, नोट-फॉर-व्होट, देवास, सीव्हीसी व अशा अनेक घोटाळ्यांमुळे कॉंग्रेसची छबी मळली, हे तर त्यांनाही कळलेच. तशात तीन-चार राज्यात निवडणुका लढवायच्या आहेत. तिथेही ह्या भ्रष्टाचारामुळे मार खावा लागेल. आता भ्रष्टाचाराची ही छबी धुवायची तर आपण भ्रष्टाचार विरोधी आहोत, हे लोकांना सहजी पटेल असे व्हायला पाहिजे. भ्रष्टाचार न करता राज्य करणे, हे तसे जिकिरीचे व लांब पल्ल्याचे काम. त्याच्याने छबी धुवायला खूपच उशीर लागेल. गेले तीन चार महिने आपले संवाददाते तुमच्यापेक्षा आम्ही बरे आहोत, निदान कारवाई करतो आहोत, असे घसा फोडून फोडून तसा प्रयत्न करताहेत . पण ते कसे तुलना केल्यासारखे होते. आधी त्यांचे नाव घ्यावे लागते. आम्हीच बेश्ट आहोत असे ठसवायला हवे. तर मग स्वच्छ वागून दाखवायला हवे. पण, तितका वेळ आहे कुणाकडे ? मग मालिकेत कसे, नायिकेचे चारित्र्य उठविण्यासाठी खलनायकाला अडचणीत आणतात, त्याला हाणतात, तसे, शत्रूचा शत्रू तो मित्र, ह्या वळणाचे काही तरी पटकन करायला हवे. हे कसे करायचे ? ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करायची वगैरे बाळबोध मार्गाने एकतर वेळ चिक्कार लागेल व शिवाय त्यात आपला काय फायदा ? आणि तरीही छबी अशी झाली पाहिजे की बघा, आम्ही किती भ्रष्ट्राचार्‍यांच्या विरुद्ध आहोत हे पटकन जनतेच्या ध्यानात यायला हवे.
तर साहेब, तुम्ही ते हिंदू आतंकवाद्यांचे चित्र उभे केले होतेत, तसे काही कराना. तुमच्याकडे एवढ्या आयडिया असतात. मग जमले तर तुमच्या लव्हासाचे बघू ना काही निस्तरता येते का ते. तर काही तरी छबी सुधरवण्याचे बघाच . भ्रष्टाचाराच्या विरोधी आहोत असे चित्र तयार होईल असे काही तरी बघा ना.
हां. भ्रष्टाचार का ? भ्रष्टाचार-विरोधी छबी काय ? बरं, अरे ते आपले अण्णा काय करताहेत आजकाल ? काही नाही ? लोकपाल बिलाचा आराखडा वगैरे करताहेत. व्वा ! व्वा ! बेस ! काम झाले की. त्यांना बोलवा इथे. बसवा जंतर मंतर ला. फार तर काय, तर बिलाचे करावे लागेल एवढेच ना ? अशी तर, ढीगभर बिले पडून आहेत आपल्याकडे. त्यातून नंतर काही तरी मार्ग काढता येईल. शिवाय नंतर कमीटीतही काहीतरी करता येईलच. पण आत्ता तर परस्पर रान पेटवून आपली पोळी शेकता येईल. फक्त माझे नाव मध्ये आले नाही पाहिजे. ते अवघड नाही हो, तुम्ही चिडून कमीटीतून बाहेर पडा, म्हणजे कोणाला संशयही येणार नाही. पण थोडे ताणून धरले पाहिजे. जॉइंट कमीटीसाठी . असे कसे करता येईल म्हणायचे . मग पार्लमेंटच बरखास्त करा म्हणायचे . मग कमीटीत पाच जण घेतो म्हणायचे, मग नोटिफिकेशन नाही काढत म्हणायचे . आत्ता मॅडम दक्षिणेत निवडणूक-प्रचारात आहेत म्हणायचे . आणि मग मी सांगीन तेव्हा हो म्हणायचे. मग अण्णांची तारीफ करायची. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचे खूप स्तोम माजवायचे . पाहिजे तर भारत-रत्नही द्यायचे. मग आपसुकच आपण त्यांचे मानले, म्हणजे आपण त्यांच्या बरोबरच होतो, हे वेगळे सांगायला नकोच. निवडणुकात बघा ह्यावरच मतं मिळतात की नाही.
पण, हे बघा, हे सगळे आमच्या आय-पी-एल च्या आधी संपले पाहिजे हां. नाही तर आमचा धंदा मंदा व्हायचा !
ओ के ? फिक्स ?

----------------------------------------------------------------------------------

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

जातीच्या लेखकाला, जातीचा पद्मश्री !
नेमाडेंना पद्मश्री मिळाल्याबद्दल काय वाटते ? असे जे विचारतात, त्यांना सांगावेसे वाटते की, प्रथम त्यांनाच काय वाटतेय ते बघूया. आता त्या थोर थोर मिशीतले, ह्या मिशाने ऐकायला मिळणार, असे वाटून गर्भगळित व्हायचे कारण नाही. कारण प्रत्येक दृष्ट्या पुरुषांसारखे त्यांनी, हे देशीवादी परंपरेने मागेच सांगून ठेवले आहे. कसे ते पहा: (टीकास्वयंवर पृ.३८३) "एकतर राष्ट्रीय पारितोषिकं ही कंपूशाहीतून निर्माण होणार्‍या दोनचार मूर्ख माणसांच्या मर्जीवर ठरत असतात."
कंपूशाही, दोनचार मूर्ख माणसं, असे कळीचे शब्द ऐकून भालचंद्र मुणगेकरांना वाटले असेल ह्याला "मागचे" कळले की काय ? तरी बरे की सिमल्याच्या शिष्यवृत्तीचे मीच जमवून आणले होते, ते हा विसरला की काय ? मग राडीया टेप्स कोणी लीक केल्या ह्या चालीवर ते प्लंबरसारखे लीक हुडकू लागले. तोच त्यांना राष्ट्रपतीभवनातून फोन आला की, "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं !"
आता महाराष्ट्राचा कोटा, यादी, केव्हाच संपली असताना, आता बाई कोणाचे सांगताहेत बरे ? एकच काम अनेक जणांनी वाटून घेण्याच्या तीळ-संस्कारा प्रमाणे, बाईंनी विलासरावांनाही निरोप दिला. विलासरावांना कळेना की एवढा काय प्रॉब्लेम त्यात ? आपण घालू तो आदर्श ! मग कळले की महाराष्ट्राच्या कोट्यात, साहित्याच्या जंत्रीत, बाईंच्या पसंतीचे नाव काही नव्हते. ते राहिलेच.
विलासराव गेले शिंद्यांकडे. शिंद्यांनी धूर्तपणे विचारले की बाई एक्झॅक्टली काय म्हणाल्या ? आता "अहो आमच्या त्या ह्यांचे काही करा बरं!" ह्यातून अर्थ काढायचा होता. शिंदे तसे कशातूनही "अर्थ" काढण्यात पटाईत. ते म्हणाले बाई म्हणाल्या "आमच्या त्या ह्यांचे", म्हणजे कोणी लेवा-पाटील असणार. कोण बरं ? लेवा पाटील म्हणतात की मूळचे पाकीस्तानातल्या पंजाब मधले, लाहोरचे. आता त्या अफझल गुरूचा कोणी आहे की काय ? काही नेम नाही ! जरा मोघम चौकशी करू. आधी दरवानाला विचारतात, कौन मुसलमान हौ क्या ? दरवान हिंट देतो, नही जी, हिंदू ही है !
तेव्हढ्यात मुणगेकर म्हणतात अहो "हिंदू"म्हणजे नेमाडे असतील. कारण तेच एकमेव लेवा आहेत मराठीत, बहिणाबाई नंतर !
विलासराव म्हणतात की उगाच रिस्क घेऊ नका. मॅडमनी सांगून ठेवलेले आहे की बाईजींवर उगाच प्रेशर येऊ देऊ नका. त्या आपल्या अफझल गुरूचे पाहताहेत ना, मग त्यांच्या एका हिंदू चे आपण पाहू शकत नाही का? चला जरा प्रयत्न करू ! मुणगेकर, काय आहे हो हे हिंदू ? त्यावर मुणगेकर म्हणतात की तसे साहित्य अकादेमीला सांगितलेले होते... पण अजून त्यांनी काही पुरस्कार दिलेले नाहीत. तेव्हा बाईंना आत्ताच काही करायचे असेल... तसे हे लेवा पाटील मूळचे पंजाब, पाकीस्तानातल्या लाहोरचे. मग विलासराव माहीती काढतात की पंजाबची लिस्ट झाली का फाइनल.? झाली ! हरयाणाची ? ती अजून बाकी आहे. असं म्हणता ? मग काही प्रॉब्लेम नाही. नुकतेच विश्वास पाटिलांनी नाही का सांगितले की पानीपतानंतर भाऊ वगैरे मंडळी हरयाणातच होती व तिथे त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते लोक चालीरीती, फेटा वगैरे मराठी वळणाचाच बांधतात. आपण त्यांच्याच फेट्याला हे लचांड बांधू .
अफजल गुरूच्या बदल्यात जमले म्हणायचे की !
तुम्हाला वाटेल का उगाच जात काढताहेत अशा वेळी ? तर तेही नेमाडेंनीच शिकविले म्हणावे लागेल. जात काढण्यात काय संकोच ? म्हणूनच तर त्यांनी "हिंदू" त ज्ञानेश्वरांची व रामदासांची जात आरामात काढली आहे. कुणब्यांचीही काढली आहे. एवढेच काय सिद्धार्थ गौतमालाही दूषणे दिली आहेत. शिवाय अशा जाती काढून त्यांनी वेळोवेळी आदर्श घालून दिले आहेत. जसे:( टीकास्वयंवर पृ.३७९ ):"आमच्या वेळी साधना होती...आज साधना ही ट्रस्ट समाजवादी चित्पावनांनी बुडवली. केसरीच्या सिंहाला गवत खायला लागलं. सेवादलातली समाजवादी माणसं कटटर जातीयवादी निघाली." ( इत:उप्पर ते अभिमानाने म्हणतात की त्यांना फक्त ( नशीब, फकत, नाही ! ) साने गुरुजी भावतात व त्यांनी साधनेत एक वर्ष नोकरीही केली आहे. ).
खरे तर २००१ साली महाराष्ट्र फौंडेशनने नेमाडेंना जीवन-गौरव पुरस्कार दिलेला होता. म्हणजे ते तेव्हाच बक्षीस मिळालेले लेखक झालेले होते. त्यांनी इतर लेखकांना आदेश दिला आहे तो असा: "अशा बक्षीस न मिळालेल्या थोर लेखकांच्या यादीत बसण्याचा प्रयत्न करावा, असं मी चांगल्या लेखकांना सांगेन. कारण बक्षीस मिळालेल्या लोकांच्या यादीत बसण्यापेक्षा ते न मिळालेल्या लेखकांच्या यादीत जाऊन बसणं अर्थातच सोपं असतं." ( टीकास्वय़ंवर पृ. ३८४ ). ३५ वर्षात हिंदू ने त्यांना इतकं पिडलेलं दिसतं की त्यांनी स्वत: कुठल्या यादीत बसायचं हेच ते विसरले असावेत ! किंवा मग विद्रोह भावला असावा ! आदत से मजबूर !
तर असा जातीच्या लेखकाचा जातीचा किताब !

-----------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, १५ जानेवारी, २०११

नारदाची कळ---१२
अकलेच्या कांद्याची गोष्ट
एक होता कांदा. अहो तो महाग-वाला नाही, अकलेचा. अकलेला मती म्हणतात, तर हा बारा अकलेचा ! ( कदाचित बारामतीचा !) तो अगदी पहिल्यांदा बेता बेताने, बांधा बांधाने ( कुंपणा कुंपणा ने ) लागवडलेला होता. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. तोच कुंपणाच्या देवाने, कराडच्या देवाने, त्याला आपल्यात घेतले, आपला मानसपुत्रच मानले व स्वत:सारखे "यशवंत" केले. ह्यानेही सहकार दिला, घेतला. होता होता, हा सगळीकडेच वावरू लागला. राज्यात मुख्य झाला, केंद्रात सुरक्षेच्या बाडबस्तात सुरक्षित झाला. कांद्याला असे घुमारे फुटू लागल्यावर त्याला आपल्या मुळाचा लईच अभिमान वाटू लागला. कोणाचे मूळ परदेशी असेल तर ते त्याला रुचेना. त्यासाठी त्याने आपापल्या मुळांचा देशी वाफाच काढला, ताफा वाढवला व विदेशी मुळांना तो कमी लेखू लागला.
पण भारतदेवाच्या मनात काही वेगळेच होते. परदेशी मुळाचे कांदे जोम धरू लागले, त्यांना कुठली तरी सूप्त परदेशी गंगाजळी मिळू लागली व त्या परदेशी कांद्याने चांगलेच बाळसे धरले . सगळे वावर व्यापून टाकले. आता बांध्यावरच्या कांद्याला मुख्यप्रवाहात डुंबावे असे हुळहुळू लागले. मग त्याने मुळेच ना ती, ती देशी काय व परदेशी काय असे म्हणत परदेशी मुळांच्या कांद्याशी दिलजमाई केली. परदेशी कांद्याला खांदा दिला, सापडेल तिथे चांद्या शोधल्या, जमवल्या, आणि देशात सगळीकडे आपल्या फांद्या पसरविल्या.
परदेशी कांद्याची रीतच न्यारी. त्याला वाटू लागले मी किती निर्मळ, स्वच्छ संगमरवरी ( इटालियन संगमरवरच जणु ) रूप, काय ती उभारी, काय तो तोरा ! तेव्हढ्यात त्या परदेशी कांद्याला आतले आवाज ऐकू येऊ लागले. त्यालाही वाटू लागले आपण जरा आतल्या आतच रहावे. कावळा शिवल्यासारखे बाजूलाच रहावे . आपण पुढे होऊ नये. मग त्याने त्यातल्या त्यात धुतलेल्या तांदळासारखा वाटणार्‍या पंजाबी कांद्याला पगडी पहनवली. पगडी, आनंदाने परदेशी कुंकू मिरवू लागली. बारा-अकलेच्या कांद्याने वाफ्यात नफा काढायची जबाबदारी घेतली. सगळीकडचे वाफे तरारून येतील, असे तो सांगू लागला. आपले मूळ गाव, बारा-अकली गाव, असलेल्या राज्यात देशी-विदेशी कांद्याची जोड-लागवडही त्याने चालू ठेवली.
बारा-अकली कांदा जोशात आला, उडू बागडू लागला, खेळ खेळू लागला. असा तसा देशी खेळ नाही तर परदेशी कांद्याला टुकटुक करणारा, त्याची विकेट काढणारा, परदेशी खेळ, क्रिकेट ! हा खेळ इतका चढू लागला की त्या बोभाट्या पाई त्याला लोक पीयेल समजू लागले. तो म्हणे काय बोलता, मी ? आय पीयेल ?
वाफ्यावरचे काम असे चालू असताना एक अवघड घडी आली. वाफ्याचा खर्च ताफ्याला परवडेना . ताफ्यातले एकेक गडी आत्महत्येने पडू लागले. सगळीकडे गदारोळ माजला. बारा-अकली कांद्याने थाप ठोकली, ही कांद्याची शेतीच परवडणारी नाही . सबब कोणी कांदे पेरुच नयेत. पगडी गदगदली. तिला वाटले जीव वाचला तर पगडी काय, पचास पेहनू . मग त्याने ताफ्याला सर्व-माफी दिली, कर्ज-माफी दिली. बारा-अकली कांद्याला हुरूप आला. त्याने आता थंड हवेच्या ठिकाणी लागवड होऊ शकते का, हे पाहण्यासाठी डोंगर कापले, दर्‍या बुझवल्या व उंचावर एक ठिकाण केले, इतके छान की बारा-अकली कांदा अगदी "हवासा" झाला, लव्हासा झाला !
तेव्हढ्यात कोणाची तरी नजर लागली. आतल्या गाठीच्या ह्या बारा-अकली कांद्याच्या तोंडाशी एक गाठशी आली. फवारून झाले, टोकरून, खुडून झाले. तशी तरारी आहे, खतपाणी अंगी लागते आहे. पण त्या तोंडाच्या गाठी मुळे तोंडातून शब्दांऐवजी आजकाल मुक्ताफळेच येतात. लवकरच आलबेल होईल असे म्हणायचे असते, पण तोंड बोलून जाते...कमसे कम तीन हप्ते लगेंगे ! परदेशी कांद्याचा छोटा कोंभ, हूल देत, मग रागावून म्हणतो, मेरे दादी का राज अकेली का था, ये हमारी मजबूरी है, ( मजबूरी का नाम गांधी !). त्यावर तोंड लगेच तावातावात उदगारते, इटली मे भी मजबूरीच है ! पगडी घाबरून पाकी कांद्याला पाचारण करते तर तोंड लगेच खोड काढते, ह्यापेक्षा आपल्याच बळीराजांना का नाही देत जरा ज्यास्तीचा भाव ?
पानीपतावर मराठयांची पत गेल्याला भले आज अडीचशे वर्षे झाली असतील, पण त्याचा वचपा काढतोय, बघा, बारा-अकली कांदा व त्याचे तोंड !